Maharashtra Rain: राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, आज 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain: राज्यात गेल्या आठवड्याभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Maharashtra Rain: राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मुंबई, ठाण्यासह उपनगरात जोरदार पाऊस झाला. तसंच राज्यात पुणे, पालघर, नाशिक, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडला. दरम्यान, हवामान विभागाने येत्या तीन दिवसात राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या तीन दिवसा मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज कोकणात रायगड, ठाणे, पालघर, मुंबईसह पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, नंदुरबार, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊसही झाला. पुण्यात पावसाने रस्त्यावर पाणी आल्यानं बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबई, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला होता.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुढच्या दोन दिवसात पाऊस पडेल. तर विदर्भाच्या काही भागातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे या ठिकाणी १६ सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या