Bareilly Viral News: गुगल मॅप किंवा जीपीएसने चुकीचा मार्ग दाखवल्याचे अनेकदा आपण ऐकतो, पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खलपूर गावाजवळ अशीच एक धक्कादायक घटना घडली, जिथे गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. भाचीच्या लग्नाला जात असताना तरुणांसोबत हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खलपूर-दातागंज रस्त्यावर सकाळी दहाच्या सुमारास बरेलीहून दातागंजला जात असताना हा भीषण अपघात झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार, जीपीएस नेव्हिगेशनचा वापर करत असताना हा अपघात घडला. या वर्षाच्या सुरुवातीला पुरामुळे पुलाचा पुढचा भाग नदीत कोसळला, पण हा बदल जीपीएसमध्ये अपडेट करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे चालकाची दिशाभूल झाली आणि कार थेट नदीत कोसळली, अशी माहिती परिमंडळ अधिकारी आशुतोष शिवम यांनी दिली.
याशिवाय, बांधकाम सुरू असलेल्या पुलावर चेतावणी फलक नसल्यामुळे चालकाने कार सुसाट वेगात पुढे नेली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार भरधाव वेगाने जात होती, ज्यामुळे चालकाला वेळीच कारवर नियंत्रण मिळवता आले नाही आणि कार तीन प्रवाशांसह रामगंगेत २५ फूट खाली कोसळली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच फरीदपूर, बरेली आणि बदायूंच्या दातागंज पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी कार आणि तीन जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती परिमंडळ अधिकाऱ्यांनी दिली. कौशल, विवेक आणि अमित अशी मृतांची नावे आहेत. मयत व्यक्ती भाचीच्या लग्नाला जात असताना हा अपघात घडला.
या घटनेची माहिती मिळताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एका युजरने म्हटले आहे की, 'गुगल मॅपवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'दु:खद घटना! केवळ गुगल मॅपवर अवलंबून राहणे धोक्याचे ठरू शकते.'
संबंधित बातम्या