भाजपपेक्षा सगळ्यात मोठा विनर राष्ट्रवादी : सुजय विखे पाटील
काँग्रेस सत्तेसाठी इतकी लाचार आहे की, ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत असंही वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) पुन्हा एकदा भाजपने (BJP) चमत्कार घडवला. भाजपने त्यांचे पाचही उमेदवार निवडून आणले. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसवर (Congress) त्यांचा पहिलाच उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेस आणि शिवसेनेची (Shivsena) मते फुटल्याचं विधान परिषदेत दिसून आले. यावरून आता भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी टीका केली असून काँग्रेस सत्तेसाठी लाचार असून ते कधीच बाहेर पडणार नाहीत असं म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी (NCP) सर्वात मोठा विनर ठरला आहे आणि सर्वाधिक नुकसान हे शिवसेनेचं झाल्याचंही ते म्हणाले.
काँग्रेसच्या पराभवाबाबत बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे मतदान फुटल्याचं चित्र स्पष्ट आहे. काँग्रेसमध्ये तर पहिल्या उमेदवाराचीच मते फुटली आहे. त्यांचा उमेदवार हरतो हा समन्वयाचा अभाव. काँग्रेस कधीच सत्तेतून बाहेर जाण्याचा विचार करणार नाही. काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे, ते सत्तेच्या बाहेर कधीच पडणार नाही.
भाजपपेक्षा सगळ्यात मोठा विनर राष्ट्रवादी असल्याचं वक्तव्यही सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ते म्हणाले की, "भाजपच्या पलिकडे सर्वात मोठा विनर ठरलाय तो राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांनी स्वत:ची मते सेफ केली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आमदार निवडून आणले. त्यांचा पक्षवाढीचा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे."
महाविकास आघाडीत सर्वात मोठं नुकसान शिवसेनेचं झालं आहे. मुख्यमंत्री असूनही आमदार सुरक्षित ठेवता येत नाही. राष्ट्रवादीसाठी चांगली अरेंजमेंट हीच आहे की इतकं खच्चीकरण होऊनही मुख्यमंत्रांना कळत नाही. बाळासाहेब असते तर सत्तेला लाथ मारून बाहेर पडले असते. शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही असंही सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या