MLC Election 2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. महाविकास आघाडीकडे २ जागांचे संख्याबळ असताना तीन उमेदवार दिले आहेत. एक अतिरिक्त उमेदवार असल्याने महाविकास आघाडी तसेच महायुती दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणी झाल्याने निवडणूक बिनविरोध न होता याची चुरस वाढली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारअसल्याने मतांचे गणित कोण कसे जुळवणार,याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव किंवा शेकापच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
१२ जुलैला होणारी विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती होती. मात्र महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार देऊन याची चुरस वाढवली आहे.मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करून ठाकरे गटाने महायुतीसमोर आव्हान निर्माण केले आहे. याला अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या संपर्कात असणे आणि शिंदे गटातही नाराजी असल्याचे कारण आहे. त्याचबरोबर नार्वेकरांचेही सर्वच पक्षात मित्र आहेत. यामुळे याचा मविआकडून फायदा उचलण्याची रणनिती आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटानेही आपला उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या रुपात दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
संख्याबळानुसार महायुतीचे ८ उमेदवार निवडून येऊ शकतात तर दोन उमेदवार मविआचे निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवारासाठी मविआला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे. शिंदेंनी बंड करण्यापूर्वी झालेल्या २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तशीच परिस्थिती नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे उद्भवणार असल्याचे दावा सरनाईक यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांकडे ६५ आमदार आहेत. तर त्यांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या अपक्ष आणि मित्र पक्षांकडे ९. तर महायुतीमध्ये भाजप व मित्रपक्ष ११०, राष्ट्रवादी ४३ आणि शिवसेना ४८ असे एकूण २०१ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला २५ मतांची गरज आहे. हे पाहिल्यास महायुतीचे ८ उमेदवार नक्कीच निवडून येऊ शकतात. परंतू, तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी मविआला ४ मतांची गरज आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोण फुटतो, यावर हे गणित ठरणार आहे. नार्वेकरांनी महायुतीची मते फोडली तर महायुतीला ७ जागा जिंकता येणार आहेत.
संबंधित बातम्या