Dinu randive smruti award 2024 : ख्यातनाम पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक आघाडीचे शिलेदार आणि भारताच्या समाजवादी चळवळीतील एक ध्येयवादी कार्यकर्ते दिवंगत श्री दिनू रणदिवे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना जाहीर झाला आहे. 'पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पारितोषिक समितीतर्फे येत्या १९ जुलै २०२४ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री सत्यरंजन धर्माधिकारी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर असतील.
दि. १६ जून, २०२० रोजी दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली सभेत, रणदिवे यांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराला प्रतिवर्षी ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला होता. त्यानुसार, २०२१ साली जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री प्रताप आसबे, २०२२ साली ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर आणि २०२३ साली ज्येष्ठ पत्रकार श्रीमती ओल्गा टेलिस यांना ‘पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. यंदा पुरस्काराचे चौथे वर्ष आहे. २०२४ चा पुरस्कार श्री मधु कांबळे यांना देण्यात यावा असे, या पुरस्कारासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्यावतीने एकमताने ठरवण्यात आले. रु.२५,००० रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर हे असून प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री गुरबीर सिंग, हिंदुस्थान टाइम्स (मराठी)चे संपादक हारीस शेख, प्रकाश महाडिक आणि पुष्पा महाडिक हे निवड समितीचे सदस्य आहेत.
पत्रकार मधु कांबळे यांचा जन्म १ जून १९६१ रोजी हरोली, ता. कवठे महंकाळ, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए. (राज्यशास्त्र) मुंबई विद्यापीठ येथे झाले. विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला. १९८९-९० च्या दरम्यान श्री साप्ताहिकामधून प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर साप्ताहिक चित्रलेखा, दै. सकाळ मधून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, कामगारांच्या प्रश्नांवर लेखन केले. १९९१ पासून मुंबई सकाळमधून पूर्णवेळ पत्रकारितेस प्रारंभ. येथे २० वर्ष राजकीय, सामाजिक विषयावर वृत्तांकन. २०११ पासून दैनिक लोकसत्ता, मुंबईमध्ये राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत. १ जून २०२४ रोजी लोकसत्तातून निवृत्त.
1 ) सन २०००- मुंबई मराठी पत्रकार संघाचा कॉ.तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार
2) सन- २०१३- कॉ. नरेंद्र (नाना) मालुसरे चॅरिटेबल संस्थेचा ‘उत्कृष्ट पत्रकारिता दीपस्तंभ’ पुरस्कार
3) सन-२०१६ -पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार.
4) सन- २०१९ महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार.
संबंधित बातम्या