Uttam jankar on Ajit Pawar : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालात महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमताने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले असताना शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलेल्या स्फोटक दाव्याने खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीत १५० मतदारसंघात गडबड झाली असून बारामती मतदारसंघात अजित पवारांचा २० हजार मतांनी पराभव झाल्यादा दावा जानकर यांनी केला आहे. उत्तम जानकर यांनी आज बारामतीतील गोविंद बाग येथे शरद पवारांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना हा खळबळजनक दावा केला.
माळशिरस मतदारसंघातील विजयी आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडीत अपेक्षित लीड न मिळाल्याने बॅलेट पेपरवर मॉक निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु प्रशासनाने हा प्रयत्न होऊ दिला नाही. यानंतर आता विधानसभेच्या १५० मतदार संघात मोठी गडबड झाली आहे. बारामतीत अजित पवार सुद्धा २० हजार मतांनी पराभूत झालेले आहेत. भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आले असून महायुतीला २३५ नव्हे तर केवळ १०७ जागा मिळाल्या आहेत.
अजित पवार गटाचे १२, एकनाथ शिंदे गटाचे १८ आमदार, तर भाजपाचे ७७ आमदार निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीने महायुतीचे १०७ व दोन-तीन अपक्ष मिळून यांची संख्या ११० पर्यंत जात असल्याचे जानकर म्हणाले.
उत्तर जानकर म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या मी अभ्यास केला आहे. व्हीव्हीपॅटमधून जी चिट्टी येते, ती खाली जाते ज्याला काळी ग्लास लावली जाते ती चिट्टी आमच्या हाती यावी, तुम्ही प्रिंट केलेली चिट्टी आमच्या हाताने त्यात टाकली जावी म्हणजे पारदर्शकता येईल.
दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत. त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहोत. येत्या चार महिन्यांच्या आत राज्यातील महायुतीचे सरकार जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळेल. तशी व्यूहरचना आखली असल्याचेही जानकरांनी सांगितले.
संबंधित बातम्या