Narayan Rane: “चार वेळा मुख्यमंत्री होता, औद्योगिक क्रांती का नाही झाली?” राणेंचा पवारांना सवाल
शरद पवार (Sharad Pawar) चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्यागिक क्रांती का नाही झाली, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे.
Vedanta Foxconn project :वेदांता-फॉक्सकॉनचा तब्बल १.५४ लाख कोटींची गुंतवणूक असलेला सेमीकंडक्टर्स निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने मुख्यमंत्री व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे सरकारवर घणाघात केले जात आहेत. त्या सरकारकडूनही उत्तर दिले जात आहे. यात आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वेदांता प्रकल्पावरून सत्ताधारी व विरोधकांचे चांगलेच कान टोचले. शरद पवार यांच्या सरकारवरील टिकेला भाजप नेते नारायण राणे (Narayan rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार (Sharad Pawar) चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात औद्यागिक क्रांती का नाही झाली, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली आहे.
त्यांच्या तडजोडीमुळे सगळे व्यवहार राज्याबाहेर गेले -
नारायण राणे म्हणाले की, विरोधकांना कोणत्याही निर्णयावर टीका करण्याशिवाय दुसरा कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केलेय? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवले. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे अनेक उद्योग राज्याबाहेर गेले आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
नव्या सरकारला सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. चार वेळा ते (शरद पवार) मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. ती का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
संबंधित बातम्या