Ahmednagar Renaming Decision : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यामुळं यापुढं हा जिल्हा अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही माहिती दिली.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून देशभरातील अनेके जिल्हे, शहरे व रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. महाराष्ट्रही त्यास अपवाद नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्यांची नावं याआधी बदलण्यात आली आहेत. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं आहे.
अहमदनगरच्या नामांतराची मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांनी या संदर्भात वक्तव्यही केली होती. राज्य मंत्रिमंडळानं ही मागणी मान्य करून व विधानसभेत तसा ठराव करून तो केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवला होता. तो आता मंजूर झाला आहे.
नगर जिल्ह्याचे सुपुत्र व राज्य सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ही माहिती दिली. नामांतराची वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे, असं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. हा निर्णय होण्यासाठी सहकार्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे मनापासून आभार, असं विखे-पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या