Uddhav Thackeray Questions Jyotiraditya Scindia : अयोध्या व गोव्यातील विमानतळांच्या नामकरणाचं स्वागत करताना माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला नामकरणाविषयीच्या धोरणाची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्रातील दोन विमानतळांच्या नामकरणासाठी दोनदा पाठवलेल्या प्रस्तावाचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. अयोध्येतील विमानतळाचं ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नामकरण झालं आहे. त्याचप्रमाणं, गोव्यातील विमानतळाला 'मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आलं आहे.
याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी पत्रात केला आहे. गोवा विमानतळाच्या नव्या नावात भाजपचे कार्यकर्ते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर ह्यांचा उल्लेख आहे. तर, अयोध्या विमानतळाच्या नव्या नावात महर्षि वाल्मिकी यांचा उल्लेख आहे. ही दोन्ही नावं स्वागतार्ह आहेत, असं सांगतानाच, उद्धव ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे.
'महाविकास आघाडी सरकारनं औरंगाबाद विमानतळाचं ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ’दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठवला होता. त्यावेळी, 'कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर संबंधित शहराच्या नावावरून विमानतळांचं नामकरण करण्याचं भारत सरकारचं धोरण आहे. त्यामुळं हा विलंब होत आहे, अशी तांत्रिक अडचण आम्हाला सांगण्यात आली होती. आता दोन्ही विमानतळांना व्यक्तींची नावं देण्यात आली आहेत. हाच नियम आमच्या राज्यातील विमानतळांना सुद्धा लागू होतो का याची माहिती द्यावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'महाराष्ट्र राज्याला गेल्या दशकभरात सतत अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आम्ही विमानतळांना ज्या २ व्यक्तींची नावे दिली आहेत आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांना परिचयाची गरज नाही. तरीही, लाल फितीच्या कारभारामुळं होणारा विलंब चिंताजनक आहे. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केलं जात असल्याचं पाहून दुःख होतं. त्याचप्रमाणं, दि. बा. पाटील ह्यांचंही समाजासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळं या दोन्ही विमानतळांच्या नामकरणाची प्रक्रिया वेगाने करावी, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या