मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : ठाकरेंचं सरकार फेसबुकवर लाइव्ह, जनतेमध्ये डेड होतं; फडणवीसांची बोचरी टीका

Devendra Fadnavis : ठाकरेंचं सरकार फेसबुकवर लाइव्ह, जनतेमध्ये डेड होतं; फडणवीसांची बोचरी टीका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 11, 2023 06:03 PM IST

Devendra Fadnavis in Amravati : यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
Uddhav Thackeray - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis in Amravati : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या पदवीधर संमेलनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘मागील अडीच वर्षे राज्यात असलेलं सरकार हे केवळ फेसबुकवर लाइव्ह होतं, जनतेत डेड होतं,’ असा घणाघाती हल्ला फडणवीस यांनी केला.

अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपनं डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ बोलताना फडणवीस यांनी स्वत:च्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

‘महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात सरकार काय असतं याची जाणीव लोकांना व्हायला लागली. अडीच वर्षे सरकार बंदिस्त होतं, दाराआड होतं. ते सरकार केवळ फेसबुकवर लाइव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेत हे सरकार कुठं दिसायचंच नाही, या सरकारची फक्त वसुली दिसायची. वसुलीचे नवनवीन उच्चांक मागील सरकारनं गाठले होते. मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे जेलमध्ये जाताना आपण पाहिजे. ‘वर्क फ्रॉम होम’ आपण पाहिलंच होतं, पण वर्क फ्रॉम जेलही त्या सरकारनं दाखवलं. मंत्री जेलमध्ये जाऊनही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हती. शेवटी ते सरकारच आपल्याला बदलावं लागलं. मंत्रीच बदलावे लागले. तेव्हाच जेलमधील मंत्र्यांचा कारभार बंद झाला,' असं फडणवीस म्हणाले.

'जनादेशाचा अपमान करून आपल्या पाठीत खंजीर खुपसून हे सरकार आलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी निर्णय केला आणि उठाव केला. या उठावाला ४० आमदार, १२ खासदार आणि १० अपक्षांची साथ लाभली आणि महाराष्ट्रात मोठं परिवर्तन घडलं. आज त्या परिवर्तनानंतर झालेलं काम आपण पाहतोय. आधीच्या आपल्या सरकारमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मागास भाग आपल्या अजेंड्यावर होता. आता अडीच वर्षात पाच वर्षांचं काम करायचं आहे. फक्त जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

IPL_Entry_Point