Uddhav Thackeray : शिवसेना नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर; उद्धव ठाकरेंनी भर बैठकीत केली कानउघडणी
Uddhav Thackeray : हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि महिला नेत्यांमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी याबाबत नेत्यांना कडक शब्दांत सुनावल्याची माहिती समोर आली आहे.
Uddhav Thackeray In Mumbai : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बैठकीत पक्षाच्या आमदारांची आणि महिला नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी लक्षवेधीवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आणि सहकारी आमदारांमधील धुसफूस समोर आली होती. याशिवाय पक्षातील महिला नेत्यांमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षामुळं उद्धव ठाकरे हे चांगलेच संतापल्याचं वृत्त आहे. त्यामुळं त्यांनी आज शिवसेना नेत्यांच्या बैठकीत गटबाजी करणाऱ्या नेत्यांना चांगलंच सुनावल्याची माहिती समोर आली आहे.
मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी बैठक सुरू होताच उद्धव ठाकरेंनी पक्षातील महिला नेत्यांतील स्पर्धेवर आणि गटबाजीवर बोट ठेवलं. आपण आपापसात भांडणं करून चांगली माणसं गमावत आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पक्षातील महिला नेत्यांना सुनावलं आहे. सध्या शिवसेनेत सुषमा अंधारे, संजना घाडी, ज्योती ठाकरे, नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विशाखा राऊत या महिला नेत्यांमध्ये पक्ष संघटनेत दबदबा निर्माण करण्यासाठी सुप्त संघर्ष सुरू असल्याची माहिती आहे.
याशिवाय हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेची पूर्वतयारीची बैठक पार पडली. त्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आणि शिवसेनेतील आमदारांमध्ये लक्षवेधीवरून मतभेद झाल्याचं समजतं. त्यावरूनही ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं आता राजकारणात नवे मित्र ठाकरे शोधत असताना पक्षातच गटबाजीच्या घटना समोर आल्यानं ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Leopard In Kalyan : बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्या अडकला; कल्याणमध्ये भरदिवसा थरार