महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत एका लग्न समारंभात भेट घेतल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघे राजकीय मतभेद मिटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीयदृष्ट्या दुरावलेले हे दोन्ही भाऊ रविवारी सायंकाळी अंधेरी परिसरात सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात एकत्र दिसले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. दोघं एकमेकांशी बोलताना दिसले आणि रश्मी ठाकरे राज ठाकरेंसोबत हसताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. या भेटीनंतर राज्यात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
आगामी महापालिका निवडणुका, विशेषत: आर्थिकदृष्ट्या संपन्न बृहन्मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता मनसे आणि शिवसेना यांच्यातील मतभेद दूर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. मात्र, महापालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा या भावांची जाहीर भेट झाल्याने दोन्ही पक्षांमधील संबंध सुधारण्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी नोव्हेंबर २००५ मध्ये (तत्कालीन एकसंध) शिवसेना सोडली आणि पुढच्याच वर्षी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेला २० जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. इतकेच नाही तर राज ठाकरे यांचा पूत्र अमित ठाकरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
उद्धव व ठाकरे यांच्यातील भेट यासाठी महत्त्वाची आहे, कारण गेल्या दोन दशकांपासून दोन्ही भाऊ एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत आणि एकमेकांवर राजकीय हल्ला करण्यात कोणीही कोणतीही कसर सोडलेली नाही, परंतु नुकतेच दोन्ही भावांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत, ज्यात दोघेही मोकळेपणाने बोलताना आणि हसताना दिसत आहेत.
यापूर्वी १५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात ठाकरे बंधू दिसले होते. त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी दादरच्या राजे शिवाजी शाळेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नाला आणि आता २३ फेब्रुवारी २०२५ रोजी अंधेरी येथील महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात राज आणि उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पा तर केल्याच पण हसत-खेळत विनोदही केला. ठाकरे बंधूंच्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा झालेल्या भेटीमुळे दोन्ही पक्षांमधील दोन दशकांपासूनचे शत्रुत्व आणि कलह संपुष्टात येण्याची चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या