Elephant attack in Gadchiroli : भामरागड तालुक्यातील हिदूर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात (elephant attack ) तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यातील दुसऱ्या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी (२५ एप्रिल) रोजी कियर येथे गोंगलू रामा तेलामी या शेतकऱ्यास ठार केले होते. त्यानंतर रानटी हत्तीने हिदूर गावात धुडगूस घालत तीन महिलांवर हल्ला केला होता. त्या तीन महिलांपैकी राजे कोपा हलामी (वय ५५) हिचा २६ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. २८ एप्रिल रोजी महारी देवू वड्डे (४७) यांचाही मृत्यू झाला आहे..
या रानटी हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात प्रवेश केला होता. २५ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भामरागड तालुक्यातील कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी या शेतकऱ्याला पायाखाली चिरडून ठार केले.
त्यानंतर हा हत्ती आरेवाडावरून दोन किलोमीटरवर अंतरावर असलेल्या हिदूर गावात पोहोचला होता. या गावात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्याने धुडगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी व वजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले. त्याचदिवशी रात्रीच्या सुमारास तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना तेथून नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान राजे कोपा हलामी (५०) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता, तर २८ एप्रिल रोजी महारी वड्डे यांनीही अखेरचा श्वास घेतला. वंजे जुरू पुंगाटी (४७) या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर आहे.
या रानटी हत्तीने हिदूर व कियर येथे अनेक जणांना जखमी करून धुडगूस घातल्यानंतर छत्तीसगडच्या सीमेवरील बिनागुंडा गावाकडे मोर्चा बळवला आहे. तेथील दामनमरका या छोट्या गावात हत्तीने धुमाकूळ घालत तेथील ५ ते ६ घरांचे नुकसान केले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
संबंधित बातम्या