Sambhajinagar Crime News Marathi : बैलगाडा शर्यतीत विजयी आणि पराभूत गटात शिवीगाळ झाल्याने मोठा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्याने विजयी आणि पराभूत गट आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली असून त्यात दोन चिमुकल्यांना गंभीर मार लागला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर तालुक्यात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या धक्कादायक घटनेमुळं जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या वासू सायगाव-आरापूर शिवारात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजयी आणि पराभूत गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करत हाणामारी करायला सुरुवात केली. या घटनेत दोन चिमुकल्यांना जबर मार लागला आहे. आयान सय्यद आणि अरिहंत त्रिभुवन असं दगडफेकीत जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावं आहे. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपींनी केवळ एकमेकांवरच नाही तर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली आहे. त्यामुळं महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यानंतर वैजापूर पोलीस तसेच शिल्लेगाव पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये दरवर्षी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात येत असतं. यावेळी लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती. परंतु आता ऐन गणेशोत्सवाचा समारोप होत असतानाच बैलगाडा शर्यतीत हाणामारी झाल्याची घटना समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या