Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यातील रजापूर येथे आज (१७ डिसेंबर २०२४) सकाळी धक्कादायक घटना घडली. आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडल्याने मृत्यू झाला. आई शेतात काम करत असताना हे दोन्ही मुले तिची नजर चुकवून खेळायला गेले. पण बराच वेळ होऊनही ते माघारी नाही. आईने दोघांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जवळच्या विहिरीत तरंगताना दिसला. या घटनेची पोचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा फणसे या आपले दोन्ही मुले प्रणव (वय, ६) आणि जय (वय, ९) यांच्यासोबत आज सकाळी आपल्या शेतात गेल्या होत्या. वर्षा शेतातील सोंगलेल्या तुरीचे पेटे जमा करत असताना प्रणव आणि जय हे दोघेही त्यांची नजर चुकवून जवळ असलेल्या विहिरीजवळ खेळायला गेले, तिथे खेळत असताना तोल गेल्याने दोन्ही मुले विहिरीत पडले. जवळच खेळत असलेले दोन्ही मुले कुठे दिसत नसल्याने वर्षा यांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी जवळच्या विहिरीत दोन्ही मुलांचा मृतदेह तरंगताना पाहून त्यांनी मोठा आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजुच्या शेतातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचोड पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर आज संध्याकाळी शोकाकुल वातावरणात दोन्ही मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या