maharashtra assembly monsoon session : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती सभागृहात दिली आहे. महाराष्ट्राचा गुन्ह्यांच्या बाबतीत देशात १० वा क्रमांक असल्याचं फडणवीसांनी सभागृहात सांगितलं आहे. याशिवाय महिलांसह बालकांवर होणारे अत्याचार आणि अपहरणांसंबंधीची माहितीही फडणवीस यांनी विधीमंडळात दिली आहे. महाराष्ट्रातून दररोज ७० हून अधिक महिला गायब होत असल्याची धक्कादायक कबुली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
विधानपरिषदेत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातून दररोज ७० महिला गायब होत आहे, असा आपण समज करून घेत आहोत. महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नाही, हे खरं नाहीय. अनेकदा जेष्ठ महिला घर सोडून निघून जातात. काही महिलांची वैयक्तिक आणि अन्य कारणं असतात. त्यावेळी पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना परत घरी आणतात, अशा घटनांमध्ये ७२ तासांच्या आत एफआयआर करावी लागते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. तसं झालं नाही तर अपहरणाची केस समजून त्याची चौकशी करावी लागत असल्याचं फडणवीसांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत महिलांना मुंबईत अधिक सुरक्षित वाटतं. असंख्य महिला नोकरीच्या किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने रात्री-अपरात्री मुंबईत प्रवास करत असतात, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र हा गुन्हेगारीच्या बाबतीत देशात तिसरा असल्याचा दावा अनेकदा करण्यात येत असतो. परंतु हा दावा खरा नाही. आपलं राज्य गुन्ह्यांच्या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु त्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण हे २९४.०३ इतकं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी होत असून महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाणही कमी होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे.
संबंधित बातम्या