मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सांगलीत रंगणार भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार.. विजेत्याला मिळणार चक्क १६ लाखाची ‘थार’

सांगलीत रंगणार भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीचा थरार.. विजेत्याला मिळणार चक्क १६ लाखाची ‘थार’

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 31, 2023 08:34 PM IST

Sangli BullockCartRace : सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये (ता. खानापूर) या शर्यतीचा थरार रंगणार असून ७ ते ९एप्रिल २०२३ दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीमध्ये महिंद्रा थार, ट्रॅक्टर्स व मोटारसायकलींच्या बक्षीसांचा धुरळा उडणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने आता राज्यात व देशभरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. मात्र संपूर्ण भारतातील बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीची आयोजन सांगली जिल्ह्यात करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील भाळवणीमध्ये (ता. खानापूर) या शर्यतीचा थरार रंगणार असून ७ ते ९ एप्रिल २०२३ दरम्यान ही शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

या बैलगाडा शर्यतीचे विशेष आकर्षण म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १६ लाखांची महिंद्रा थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर बक्षीस होते व अन्य नंबरवरती येणाऱ्या बैलगाडा चालकांना काही बक्षीस मिळत नव्हते. मात्र या स्पर्धेत दुसऱ्या व तिसऱ्या नंबरच्या विजेत्यांना ट्रॅक्टर्स देण्यात येणार आहेत. चार, पाच व सहा नंबरवरती शर्यती संपवणाऱ्या विजेत्यांना मोटारसायकली देण्यात येणार आहेत. रुस्तुम ए हिंद असे या बैलगाडा शर्यतीचे नाव ठेवण्यात आले असून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनीही स्पर्धा आयोजित केली आहे.

पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले की, चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत भाळवणी या ठिकाणी येत्या ७ ते ९ एप्रिलपर्यंत भाळवणीच्या (ता खानापूर) मुल्ला नगरातील मोकळ्या मैदानात आयोजन केले आहे. भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत आयोजन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. विट्यात आम्ही भारतातील सर्वात मोठी तालिम बांधण्याचे काम करत आहोत.

चंद्रहार पाटील म्हणाले की, सेमी फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या बैल गाड्यांना कोणीही बक्षीस देत नव्हते. तो निर्णय आम्ही बदलला असून सेमी फायनलमध्ये पराभूत बैलगाड्यांना टू-व्हीलर बक्षीस म्हणून ठेवले आहे. त्याचबरोबर गटात जी गाडी पहिली येईल त्यांना कोणी आजपर्यंत बक्षीस देत नव्हते त्यामध्ये सुद्धा आम्ही बदल करून प्रथम क्रमांकाच्या गटामध्ये ज्याची बैलगाडी येईल त्याला सुद्धा मानाची गदा आणि चषक देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गोवंश संवर्धनासाठी हा प्रयत्न असल्याचे चंद्रहार पाटील म्हणाले.

 

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जात आहेत. शर्यतीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणावर अनुकूल परिणाम झाला आहे. शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होत आहे तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खिलार बैलजोडीच्या किंमती या लाखोंच्या घरात गेल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग