कवी मन असल्याशिवाय साहित्यिक लेखन होऊ शकत नाही. साहित्यनिर्मितीसाठी मनात कोमलता आणि निर्मलता लागते. ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभवच नाही, ते अनुभव पुस्तकातून मांडणे हे कृत्रिम असते. असं मत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. पत्रकार विकास महाडिक लिखित ‘एका आज्जीची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील वाशी स्थित साहित्य मंदिर सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ कवी, साहित्यिक अरुण म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.
तर मी १९९५ सालीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो - गणेश नाईक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती धीरूभाई अंबानी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, दिवंगत प्रमोद महाजन हे चांगले मित्र होते. ते दर आठ-पंधरा दिवसांनी धीरूभाईंच्या मुंबईतील ‘सी विंड’ या निवासस्थानी भेटत असत. तेव्हा कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाईंनी बाळासाहेब ठाकरे यांना मला मुख्यमंत्री करा असे सुचवले होते. बाळासाहेब ठाकरे यांना मात्र हा प्रस्ताव आवडला नव्हता. अशी आठवण नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेतेपदाची जबाबदारी जबरदस्तीने टाकली होती. मात्र पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांना डावलून मला गटनेते पद देणे मला आवडले नाही. राजकारणात आलेली संधी सोडू नये, राजकारणात इतरांना टांग मारूनच पुढे जायचे असते, असं सांगितलं जातं. पण माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत तेथे अशा प्रकारे टांग मारणं मला कधी आवडलं नाही असा टोला नाईक यांनी मारला.
व्हाट्सॲप, फेसबूकवर लिहिण्यापेक्षा दीर्घ लिखाण कराः समर खडस
‘आपल्या समाजात ज्या वर्गाकडे समृद्ध अनुभव आहे त्यांनाच साहित्य विश्वात फारसं स्थान नाही. परंतु ज्यांच्याकडे काहीच अनुभव विश्व नाही ते मात्र आपल्या भाषेत मोठे लेखक झालेत हे मराठी भाषेचं दुर्दैव आहे’ असं मत राजकीय विश्लेषक, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस यांनी व्यक्त केलं. नवोदित लेखकांनी मनावरचे दडपण झुगारून आपले अनुभव लिहायला हवे. आपले अनुभव हेच बावनकशी सोनं असून ज्या भाषेत असं लिखाण झालं त्या भाषेतलं साहित्य मोठं होतं. इसाप हा गुलाम होता. शेकडो वर्षापूर्वी त्याने लिहिलेल्या कथा आजही वाचल्या जातात. कानडी, हिंदी भाषेत असे अनेक थोर लेखक झाले आहेत. असे अनुभव मराठीत यायला पाहिजे, अशी अपेक्षा खडस यांनी व्यक्त केली. आजच्या व्हाट्सअपच्या काळात लोकांना फक्त व्हाट्सअपवर मिळणारं ज्ञानच थोर वाटतं. व्हाट्सअप आणि फेसबूकवर लिहिण्यापेक्षा दीर्घ लिहिणं ही मोठी आणि चांगली प्रक्रिया असल्याचं समर खडस यावेळी म्हणाले.
'एका आज्जीची गोष्ट' पुस्तकातला प्रवास हा अनेकांना आपल्या गावची आठवण करून देणारा असल्याचं मत कवी, गीतकार आणि निवेदक अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केलं. कोकणातली माणसं मुंबईत येतात तेव्हा अनेक वर्ष गावच्या आठवणीतच रमतात. गावची माणसं, गावची शेती, गावची खाडी, गावचे मासे या गोष्टी मनातून जात नाही. साहित्यामध्ये तुमचं केंद्र निश्चित असेल तर अघळपघळपणा निघून जाऊन व्यवस्थितपणा येतो. हे पुस्तक खूप मधाळ, वेल्हाळ भाषेत लिहिलं गेलं असून बहुजन समाजातलं साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे, अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पुस्तकाचे लेखक, पत्रकार विकास महाडिक यांनी पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा आणि विषद केली. कार्यक्रमात महेश म्हात्रे, अभय देशपांडे, प्रफुल्ल वानखेडे, कैलास शिंदे, अभिजीत बांगर यांनीही आपले विचार मांडले.
संबंधित बातम्या