Ambernath Murder News: अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या करण्यात आली. अंबरनाथ पूर्व मध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या ब्रिजवर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही भयंकर घटना घडल्याचे सांगण्यात आले. मयत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. या महिलेने आरोपीला उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे परत दे, नाहीतर माझ्याशी लग्न कर, असा तगदा महिलेने आरोपीच्या मागे लावला होता. यातूनच त्यांच्यात वाद झाला आणि आरोपीने दिवसाढवळ्या महिलेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सीमा कांबळे (वय, ३५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, राहुल भिंगारकर (वय, २९) असे अटक करण्यात आलेला आरोपीचे नाव आहे. सीमा ही विवाहित असून पतीपासून विभक्त राहत होती. सीमा आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहारही झाले. सीमाने आरोपीला काही उसने पैसे दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी सीमाने आरोपीकडे तिने दिलेले उसने पैसे मागायला सुरुवात केली. उसने घेतलेले पैसे घे नाहीतर, माझ्याशी लग्न कर असा सीमाने राहुलच्या मागे लागला होता.
दरम्यान, सोमवारी दोघांमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रीजवर याच मुद्द्यावरून वाद झाला. त्यावेळी आरोपीने कशाचाही विचार न करता सीमावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सीमा गंभीर जखमी झाली. रुग्णालयात दाखल करण्यातआधीच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अंबरनाथ परिसरात गेल्या काही दिवसांत अनेक गुन्ह्यांच्या घटना उघडकीस आल्या. सातत्याने गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढिवसाढवळ्या अशा घटना घडत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अशा घटनांवर आवर घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संबंधित बातम्या