ठाण्यात १३ वर्षीय मुलाची मित्रांनी केली हत्या, २५ लाखांच्या खंडणीसाठी कृत्य
१३ वर्षीय मुलाची आई बारमध्ये काम करत असल्याने तिच्याकडे पैसे असतील असं समजून खंडणीसाठी मुलाचे अपहरण त्याच्याच मित्रांनी केले होते.
ठाण्यात मिरारोड इथं एका १३ वर्षीय मुलाची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ लाखांच्या खंडणीसाठी हे कृत्य करण्यात आल्याचं समोर आलं आहे. १३ वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची चाकूने भोसकून हत्या केली गेली. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग या राहतात. त्यांना अजय (१५) आणि मयांक सिंग (१३) अशी दोन मुलेही आहेत. बोरिवलीत एका बार मध्ये गायिका म्हणून त्या काम करतात. रविवारी रात्री नेहमप्रमाणे त्या कामावर गेल्या होती. तेव्हा रात्री १२ च्या सुमारास मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता.
मयांक बेपत्ता झाल्यानंतर याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी मयंकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) अशा दोन आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी हे मयत मुलाचे मित्र होते. मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असं त्यांना वाटत होतं. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण केलं. त्यानंतर खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याच्याच फोनवरून खंडणी मागण्यात आली होती, असेही पोलिसांनी सांगितले.