Weather Update : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; कोकणात पावसाची हजेरी
Weather Update Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खालावलं आहे. त्यामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये हळूहळू थंडी वाढत असल्याचं चित्र आहे.
Weather Update Maharashtra Live Today : हिवाळा सुरू होऊनही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान स्थिर होतं. परंतु आता अनेक जिल्ह्यामधील तापमान हळूहळू कमी होत असल्यानं थंडीचा तडाखा वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण वाढत असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. याशिवाय हिमालयाच्या पश्चिमी भागात पुढील दोन दिवसांच्या सुमारास चक्रवात धडकणार आहे. त्यामुळं हिमालयातून महाराष्ट्राच्या दिशेनं थंड वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. परिणामी अनेक ठिकाणी थंडी वाढल्यानं शेकोट्या पेटल्या आहेत.
राज्यातील मराठवाड्यासह कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळं कोकणातील सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. परिणामी दोन्ही जिल्ह्यात थंडी वाढल्याचं पाहायला मिळालं. कोकणासह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तापमानात घट झाल्यानंही थंडीचा पारा वाढला आहे. हिमालयातून थंड वारे महाराष्ट्रात येत असून दक्षिणेतील बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी वाढल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
गोंदिया-११.२, वर्धा-१२, नागपूर-११.३, जळगाव-१२.३, पुणे-१५, कोल्हापूर-२२.८, औरंगाबाद-१२.३, नाशिक-१३, सांगली-२१.८, सातारा-२०.६, सोलापूर-१८.५, मुंबई-२०.८, रत्नागिरी-२२
दरम्यान यंदा पावसाळ्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला होता. पावसाळा संपल्यानंतर यावर्षीच्या हिवाळ्यात थंडीचं प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यातच आता हिवाळ्याचा तिसरा महिना सुरु होत असून आता राज्यात थंडीचा ज्वर वाढत असल्याचं दिसून येत आहे.