Maharashtra weather update : राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असे संमिश्र वातावरण आहे. विदर्भात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. आज देखील विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या ठिकाणी सोसत्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडे राहणार असून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार एक कमी दाबाची रेषा ईशान्य उत्तर प्रदेश पासून पूर्व विदर्भापासून जात आहे. तसेच एक पश्चिमी विक्षोभ भारताच्या पश्चिमेवर स्थित आहे. याचे परिमाण राज्याच्या हवामानावर होत आहे.
हवामान विभागानुसार पुढील काही दिवस कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार आहे. या सोबतच किमान तापमानात उद्यापासून किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात मात्र, सरासरी पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आस पासच्या परिसरात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार असून वेळोवेळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्याच्या कमाल आणि किमान तापमानात देखील वाढ होण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
मुंबईत देखील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पारा हा ३५ अंश सेल्सिअस पार गेला आहे. एकीकडे उन्ह आणि दुसरीकडे दमट वातावरण यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे.
विदर्भात दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि गारपीटीने नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात गहू, मिरची, चणा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या