Summer Season In Nashik and Pune : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या अवकाळी पावसाच्या घटनांतर आता पुण्यासह नाशिक शहरातील तापमानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकसह पुण्यातील तापमानाने चाळीशी पार केल्यामुळं त्याचा शहरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळं शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य झाले असून अनेकांनी भरदुपारी बाहेर निघणं टाळलं आहे. त्यामुळं आता अनेकजण वीकेंडला फिरण्याची तयार करत असतानाच तापमानात वाढ होत असल्यामुळं चिंता वाढल्या आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिक कासावीस झाले आहेत. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अनेक लोक घराबाहेर पडणं टाळत आहे. त्याचा परिणाम शहरातील बाजारपेठा आणि वाहतुकीवरही पाहायला मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसर आणि पेठांच्या भागातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय नाशिकमधील शालिमार, शिवाजी रोड आणि सीबीएस मार्गावर वाहनांची संख्या कमी झाली होती. नोकरदार आणि कामगार वर्गच घराबाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील तापमान जवळपास ४० अंशावर पोहचलं आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांतही तापमानात वाढ होत असल्यामुळं नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
संबंधित बातम्या