Rathi Hatyakand Case Pune Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील राठी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गर्भवती महिलेसह सात जणांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असल्याचा दाखला देत सुप्रीम कोर्टानं आरोपीची मुक्तता केली आहे. मिठाईच्या दुकानात पगारवाढ न केल्याच्या कारणावरून कामगार असलेल्या आरोपींनी मालक केसरीमल राठी यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. परंतु डाव फसल्यानंतर आरोपींनी त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. त्यात नारायण चेतनराम चौधरी हा आरोपी होता. परंतु ज्यावेळी त्यानं गुन्हा केला त्यावेळी तो अल्पवयीन होता, असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टानं त्याच्या मुक्ततेचे आदेश जारी केले आहे. त्यामुळं आता राठी हत्याकांडातील आरोपी नारायण चेतनराम चौधरी याची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुण्यातील पौड परिसरातील शिला विहार कॉलनीत राहणाऱ्या राठी कुटुंबातील आठ जणांची २६ ऑगस्ट १९९४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात राजू राज पुरोहित, जितू नैनसिंग गेहलोत, नारायण चेताराम चौधरी यांना अटक केली होती. परंतु राठी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी राजू राज पुरोहित हा माफीचा साक्षीदार बनल्यानं त्याची यापूर्वीच मुक्तता करण्यात आली होती. अन्य दोन आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०१६ साली दोन्ही आरोपींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.
आरोपींनी राठी कुटुंबातील सहा आणि मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेला संपवलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती. राठी हत्याकांड प्रकरणातील तीनपैकी दोन आरोपींची मुक्तता झाली असून केवळ एकच आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यानंतर आता गेल्या २८ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या नारायण चेतनराम चौधरी यांची सुप्रीम कोर्टाकडून मुक्तता करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या