तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिकच्या ३ तरुणांचा सोलापुरात अपघाती मृत्यू, ५ जखमी
सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. सर्व तरुण नाशिक जिल्ह्यातील एकाच गावातील आहेत.
सोलापूर-तुळजापूर मार्गावर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त तरुण तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिकहून आले होते. तुळजापूरकडे जात असताना तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला व यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निखील रामदास सानप (वय २१), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२) आणि अथर्व शशिकांत खैरनार (वय २२, तिघे रा. चास, ता.सिन्नर, जि. नाशिक) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बीडकर (वय २२) आणि दीपक बीडकर (वय २६, सर्व रा. चास, ता. सिन्नर) अशी जखमींची नावे आहे. जखमींवर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त तरुण सिन्नर तालुक्यातील चास या गावातील आहे. सर्वजण एकाच गावातील असून ते देवदर्शनासाठी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर व अक्कलकोटला जात होते. सोलापुरातून तुळजापूरला जाण्यासाठी सर्वजण बोलेरो गाडीतून (एमएच १५ ईएक्स ३२११) प्रवास करीत होते. सकाळी सोलापुरातून तुळजापूरकडे निघाल्यानंतर तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर तामलवाडीजवळ त्यांच्या गाडीचे टायर फुटले आणि भरधाव गाडी अनियंत्रित होऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात हलवले.