“..त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री बदलला आणि सरकारही”, मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंना कोपरखळी
Assembly Winter Session : हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
नागपूर - हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना जोरदार फटकेबाजी करत आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोले लगावले. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा असा टोमणा मला मारण्यात आला होता. मग मी म्हणतो अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा. लोकांचं हे बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला वसरकारच बदललं.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही आमचं सरकार आल्यानंतर दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी जल्लोषात साजरी केली. घराच्या बाहेर पडल्याचा लोकांना आनंद झाला. चीन, जपानमध्ये कोरोना आला आहे, सरकार बदललं नसतं तर येथे अधिवेशनही झालं नसतं. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना त्यांनी ही टोलेबाजी केली.
आज कोरोना जपान आणि चीनमध्ये आहे. मात्र महाराष्ट्रात सरकार बदललं नसतं तर येथे अधिवेशन झालंच नसतं. अजित पवारही या गोष्टीला नकार देणार नाहीत. गेल्या अडीच वर्षात कोरोनाच्या स्थितीत राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं. आम्ही आल्यानंतर राज्याला चालना देण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे आम्हाला कळलं आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. कधीही त्याला काही मागायची गरज लागली नाही.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे ज्या प्रबोधनकारांनी अनिष्ट प्रथांना कायम विरोध केला,त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू-टिंबूची भाषा करायला लागले? मला आठवतंय आम्ही वर्षावर नंतर गेलो आधी काय काय आहे ते बघा म्हटलं. आम्हाला पाटीभर लिंबं सापडली तिकडे. लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्याच नाही तर प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली.
संबंधित बातम्या