Sanjay Raut: 'दबावाला बळी पडून पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त असू शकत नाहीत'
Sanjay Raut slams Shiv Sena Rebel: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदार व खासदारांवर जोरदार तोफ डागली.
Sanjay Raut on Revolt in Shiv Sena: ‘आमदार, खासदार किंवा नगरसेवकांच्या जाण्यानं शिवसेना संपत नाही. शिवसेना मजबूत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मजबुतीनं वाटचाल करतेय. आमदार, खासदार म्हणजे शिवसेना नाही. ईडीला घाबरून व आमिषाला बळी पडून पळून जाणारे बाळासाहेबांचे भक्त असूच शकत नाहीत,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बंडखोरांवर तोफ डागली.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांनी यावेळी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘काल रस्त्यावर दिसला तो शिवसेना पक्ष होता. आमदार, खासदार म्हणजे शिवसेना नाही. हे लोक का सोडून गेले तेही लवकरच समोर येईल. नितीन देशमुख व कैलास पाटील या आमच्या दोन आमदारांची आज पत्रकार परिषद आहे. ते सगळी कथा सांगतील. आमदारांवर किती दबाव आहे हे कळेल,’ अशी माहिती राऊत यांनी दिली.
‘शिवसेनेचे १७ ते १८ आमदार अजूनही भारतीय जनता पक्षाच्या कब्जात आहेत. भाजप हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशा प्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही,’ असा आरोपही राऊत यांनी केला.
'ईडीच्या दबावाला व आमिषाला बळी पडून पक्ष सोडणारे बाळासाहेबांचे भक्त असू शकत नाही. माझ्यावरही ईडीचा दबाव आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. आमच्या आणखी एका नेत्याची चौकशी सुरू आहे. पण आम्ही पक्ष सोडला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेत राहू आणि लढू. शिवसेना मजबूत आहे. हजारो, लाखो शिवसैनिक पक्षासोबत आहेत, असा दावा राऊत यांनी केला.