मतदान केंद्रांतील गैरसोयींच्या तक्रारी येत असतानाच एकाचा जीवही गेल्याचे समोर आले आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात डिलाईल रोड येथील सखुबाई मोहिते मार्गावरील मतदान केंद्र क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेचे (Shiv Sena UBT) पोलिंग एजंट मनोहर नलगे (वय ६२) यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मतदान केंद्रात अस्वस्थ वाटत होते. मतदान संपल्यानंतर ते नलगे शौचालयात गेले आणि तिथेच कोसळले. शौचालयाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढावे लागले. हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासणीनंतर समजले.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. प्रचंड उकाडा असल्यामुळे मतदानासाठी गेलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. काही मतदान केंद्रांवर मतदानासाठी गेलेल्या मतदारांना उन्हामुळे चक्कर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काहींची प्रकृती बिघडल्याच्याही घटना घडल्या आहेत.
वरळीतील डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. येथे मनोहर नलगे कार्यरत होते. तीव्र उन्हामुळे नलगे यांना त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मनोहर नलगे यांना इतरांनी केईएम रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे नलगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही शोककळा पसरली आहे.
दरम्यान, राज्यात लोकसभेच्या पाचव्या व राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांचा समावेश होता. मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडलं. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाला ज्या ठिकाणी जास्त मतदान पडतंय त्या ठिकाणी केंद्रावर जाणूनबूजून विलंब केला जात आहे,मतदारांना मुद्दाम ताटकळत ठेवलं जात असल्याचं दिसतंय, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.
संबंधित बातम्या