Saamana Editorial on Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात आज श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना होत आहे. त्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, या सोहळ्याच्या निमित्तानं भाजप पुन्हा रामनामाचं राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांंच्या शिवसेनेनं केला आहे. अयोध्येच्या निमित्तानं नवं 'मोदी रामायण' सुरू असून त्याचा रामाशी व रामराज्याशी काही संबंध नाही, असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये आज 'नवे रामायण' या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यात रामजन्मभूमी आंदोलनाच्या इतिहासाची उजळणी करताना आजच्या सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, या निमित्त भाजप करत असलेल्या राजकारणावर व नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
'अयोध्येतील बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला भाजपनं नकार दिला होता. वाजपेयी, आडवाणींपासून अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला होता. भाजपचा बाबरी पतनाशी संबंध नाही. हे काम शिवसैनिकांनी केलं असावं, असं वक्तव्य तेव्हाचे भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी केलं होतं. हा पळपुटेपणा व जबाबदारी झटकण्याचा प्रकार होता. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतली, याची आठवण अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.
> अयोध्येतील प्रदीर्घ बंदीवासातून अखेर भगवान श्रीराम मुक्त झाले, पण मुंबईसह देशभरात दंगली उसळल्या. त्यानंतर बदला म्हणून मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिका घडवून शेकडो बळी घेतले गेले. दंगलीच्या वणव्यात पाकड्या अतिरेक्यांशी लढण्याचे व मुंबईचे रक्षण करण्याचे शौर्यही शिवसैनिकांनीच दाखवले. हिंदू म्हणून शिवसैनिकांनी गुजराती, उत्तर भारतीय, जैन, मराठी अशा सगळ्यांच्याच रक्षणाची जबाबदारी तेव्हा पार पाडली.
> अयोध्या प्रकरणानंतर सगळ्यात जास्त घाव मुंबईनं झेलले हे विसरता येणार नाही. हिंदुत्वाची आग महाराष्ट्रानं पेटवली व त्याचा वणवा देशात पेटला. आजचा भाजप तेव्हा कुठंच नव्हता. मुंबईच्या दंगलीत तर आज फुरफुरणारी त्यांची मंडळी बिळातच होती. हिंदुत्व रक्षणासाठी बळी पडले ते शिवसैनिक.
> आज भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा भाग्याचा, गौरवाचा दिवस आहे. पण रामाच्या राज्यावर आज भाजपच्या फौजांनी ताबा घेतला असून अयोध्येला २०२४ च्या निवडणुकांचं रणमैदान बनवलं आहे. भारतीय जनता पक्ष आजही श्रीरामाचेच खातो, पण रामाचा विचार, रामराज्य मात्र वाऱ्यावर आहे.
> भाजपच्या लोकांनी देशभरात वातावरण निर्मिती केली आहे, जणू वाल्मीकीचं, तुलसीचं, कबीराचं, कम्ब रामायण खरं नसून मोदी हेच नव्या रामायणाचे निर्माते आहेत. अयोध्येच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांनी देशाला पुन्हा किमान ५०० वर्षे मागे नेलं. पुराणाच्या वातावरणात नेलं. आधुनिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं पूजाअर्चा, व्रत, अनुष्ठानं करीत आहेत, उपवास करीत आहेत. पंतप्रधान सतरंजीवर झोपत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले, ते गमतीचं आहे.
> अयोध्येत या निमित्तानं नवं ‘मोदी रामायण’ निर्माण झालं, ते संपूर्ण राजकीय आहे. श्रीरामाच्या जीवन, चारित्र्याशी, रामराज्याशी, सत्य मार्गाशी, संयम आणि शौर्याशी या ‘मोदी-रामायणा’चा संबंध नाही.
संबंधित बातम्या