shivsena Revolt: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सातारा पुन्हा चर्चेत; हे आहे कारण
Eknath Shinde Revolt Satara Connection: शरद पवार यांच्या पावसाळी सभेनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं सातारा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Eknath Shinde Revolt Satara Connection: शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर सातारा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जिल्ह्यातील दोन आमदार शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) व महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जात आहे. सातारा जिल्ह्यात याची जोरदार चर्चा आहे.
शंभुराज देसाई हे शिवसेनेचे पाटणचे आमदार आहेत तर महेश शिंदे हे कोरेगाव विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. यापैकी शंभुराज देसाई हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विश्वासातील मानले जात होते. त्यामुळंच महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना गृह राज्यमंत्रिपदासारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं होतं. शंभुराज देसाई असा काही निर्णय घेतील असं कुणालाही वाटलं नसावं. मात्र, हे सगळं प्रत्यक्षात घडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं उद्धव ठाकरे यांना जितका धक्का बसला आहे, तितकाच धक्का शंभुराज यांच्या भूमिकेमुळं बसला असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या योजनेत शंभुराज देसाई हे सुरुवातीपासून सक्रिय होते. शंभुराज देसाई यांनी स्वत: शिंदे यांना साथ दिल्यामुळं शिवसेनेतील अनेक आमदार बिथरले व तेही उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाण्याच्या निर्णयाप्रत आले. त्यामुळंच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर येणाऱ्या नव्या सरकारमध्ये शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी दिली जाणार असल्याचं बोलल जातं. सातारा जिल्ह्यात विशेषत: या तिन्ही नेत्यांच्या तालुक्यात याबाबत खमंग चर्चा सुरू आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात सातारा जिल्हा असाच चर्चेत आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यातील अनेक नेते व आमदार शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले होते. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्यात शरद पवार यांची ऐतिहासिक सभा झाली होती. या सभेनं संपूर्ण वातावरण फिरवून टाकलं होतं. या सभेमुळं उदयनराजे यांचा पराभव झाला व राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात फायदा झाला होता.