Saamana Editorial : बॉम्बस्फोट आणि दंगलीत कुळे-बुळे कुठं होते?, मेमनवरून शिवसेनेनं फडणवीसांना डिवचलं
Saamana Editorial : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून शिवसेनेनं भाजपवर पलटवार केला आहे.
Shiv Sena vs BJP : मुंबईत याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापलेलं आहे. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभिकरण हे शिवसेना सत्तेत असतानाच झाल्याचा आरोप केला होता. परंतु आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपला जोरदार प्रत्यूत्तर देत फडणवीसांचा उल्लेख राज्याचे खरे मुख्यमंत्री असा करत त्यांना डिवचलं आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं याकूब मेमनच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करताना म्हटलंय की, याकूब मेमनच्या प्रकरणावर शिवसेना फडणवीसांवर शंभर प्रश्नांचा भडिमार करू शकते. परंतु शिवसेनेला इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण करायचं नाही. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा आणि दंगलींचा सर्वात मोठा आघात शिवसेनेवर झाला. तेव्हा भाजपमधील हिंदुत्त्ववादी कुळे-बुळे कुठे होते?, असं म्हणत शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईत संकटात असताना हे कोणत्या बिळात लपून बसलेले होते, हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. याकूबवर छाती पिटणारे तेव्हाच्या कोणत्याच लढाईत नव्हते तेव्हा केवळ शिवसेनाच मुंबईकरांची रक्षणकर्ती होती, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.
अतिरेकी अफजल गुरूला फाशी देण्यात आली आणि त्याला तिहारच्या कारागृहातच दफन करण्यात आलं होतं. परंतु हे याकूब मेमनच्या बाबतीत का केलं गेलं नाही? हे नागपूरात केलं असतं तर हे कबरीचं प्रकरण घडलंच नसतं. परंतु तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) मोठ्या दिलदारीनं याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुबियांकडे सोपवल्याचं सांगत शिवसेनेनं या याकूब प्रकरणावरून थेट फडणवीसांना घेरलं आहे.
अतिरेक्याच्या कबरीवर दिवे लावले, त्याची कबर संगमरवरी दगडानं सजवली. आता त्याचे खापर भाजपच्या कुळ्या-बुळ्यांनी शिवसेनेवर फोडलं आहे. भाजपकडे कोणतेही जीवनावश्यक मुद्दे नसून आता त्यांनी याकूब मेमनची कबर खणण्याचं काम हाती घेतली आहे. आता मेमनच्या कबरीवर सजावट कुणी केली, याच्या चौकशीचे आदेश (उप) मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. आम्हीही त्या चौकशीचं स्वागत करतो. होऊनच जाऊ द्या, असा हल्लाबोल करत शिवसेनेनं फडणवीसांवर चिमटा काढला आहे.