राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या सहा जागा रिक्त होत आहेत. भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे,विकास महात्मे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.सध्याच्या विधानसभेतल्या आमदारांचं संख्याबळ पाहाता भाजप दोन आणि महाविकास आघाडीतले तीनही पक्ष म्हणजेच शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एक एक उमेदवार उभा करु शकतो. मात्र अनिल परब यांनी नुकत्याचं केलेल्या वक्तव्यानुसार शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार उभा करणार असल्याचं समजतंय.
छत्रपती संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते. आता त्यांची मुदत संपल्यानं त्यांनी मोदी आणि फडणवीसांच्या प्रयत्नाने आपल्याला पहिली टर्म मिळाली होती असं सांगत त्या दोघांचेही आभार मानले होते. आपण कोणत्याही पक्षातर्फे उमेदवार म्हणून उभं राहाणार नसल्याचं सांगत छत्रपती संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मात्र त्यांची उमेदवारी भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकते, असा अंदाज महाविकास आघाडीतील नेत्यांचा होता. त्यामुळे संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीत किंतु परंतू पाहायला मिळत होतं.त्याचाच एक भाग म्हणून आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेना सहाव्या जागेसाठी आग्रही असल्याचं सांगत शिवसेना दोन उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. यानं छत्रपती संभाजीराजेंसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
शिवसेना संजय राऊत यांच्याच रुपात पुन्हा एकदा एक खासदार राज्यसभेवर निवडून आणू शकते. भाजप दोन खासदार राज्यसभेवर निवडून आणू शकते, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी एक खासदार राज्यसभेवर निवडून आणण्याची ताकद ठेवतेय अशात सहाव्या उमेदवाराच्या रुपात शिवसेनेनं आपला उमेदवार उभा केल्यास महाविकास आघाडी सरकारमधले पक्ष आणि भाजप यांच्यात संघर्ष अटळ आहे.
अशात आता संभाजी राजेंची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. सर्वपक्षांना छत्रपती संभाजीराजेंनी मदतीची साद घातली होती खरी, मात्र देवेंद्र फडणवीस आणि मोदींचे मानलेले आभार छत्रपतींच्या अंगलट आल्याचं बोललं जातय.