Ramdas Kadam : अब्दुल सत्तार यांच्यानंतर आता रामदास कदम यांची जीभ घसरली, म्हणाले...
Ramdas Kadam On Anil Parab : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये बोलताना अनिल परब यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केली.
Ramdas Kadam On Anil Parab : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हाफकिन संस्थेसंदर्भात केलेलं वक्तव्य असेल किंवा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेलं अश्लाघ्य वक्तव्य असेल. या वक्तव्यांवरून वाद सुरू असतानाच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची माजी मंत्री अनिल परब यांच्याबाबत बोलताना जीभ घसरली आहे. त्यामुळं तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यानंतर रामदास कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
आज सकाळी माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांनी शिवसेनेला संपवण्याचं काम केलं आहे. त्यांना लवकरात लवकर अटक व्हायला हवी. दापोलीची नगरपरिषद सेनेच्या ताब्यात होती परंतु त्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घातली. त्यांनी माझ्या मुलाला खूप त्रास दिला आहे. उद्धव ठाकरेंनाही त्यांच्याभोवती असेच XXXX लोक पाहिजे असतात. तर दुसरीकडे सुभाष देसाई हे उद्धव ठाकरेंचे कान भरतात, असं वक्तव्य रामदास कदमांनी केल्यानं वादंग पेटण्याची शक्यता आहे.
खोके दिल्याचे पुरावे विरोधकांनी सिद्ध करावेत- कदम
राज्यात सत्तांतर झाल्यापासून विरोधक शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करत आहेत. त्यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, हो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोके देतात पण जनतेच्या विकासकामांसाठी देतात. त्यामुळं विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत, असं आव्हानही त्यांनी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला दिलं आहे. जेव्हा शिवसेनेत बंड झालं तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की आमदारांना मी परत आणतो, तुम्ही राष्ट्रवादी-कॉंग्रेसची साथ सोडा, परंतु शिवसेना फुटली तरी चालेल मात्र त्यांची साथ सोडायची नाही, अशी भूमिका तेव्हा उद्धव ठाकरेंनी घेतली होती, असा गौप्यस्फोटही रामदास कदमांनी केला आहे.