Sanjay Raut on Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने ते आज शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिम्मत नाही. त्यामुळे ते आज १०० टक्के शपथ घेतली असे राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्यासाठी आरक्षित केलं आहे, असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.
राजधानी दिल्लीत संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहे. फडणवीसांना शुभेच्छा. राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी त्यांची आहे. गेल्या डीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले आहेत. एकनाथ शिंदे हे आज १०० टक्के उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय राहिलेला नाही. दिल्लीसमोर लढायची हिम्मत त्यांच्यात नाही. ती ताकद त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे. शिंदे यांचे युग संपले आहे. भाजपला केवळ त्यांची दोन वर्षांची गरज होती. भाजप एकनाथ शिंदे यांचा पक्ष देखील फोडू शकतात. देवेंद्र फडवणीस यांच्याकडे बहुमत आहे. असे असतांना देखील १० दिवस झाले तरी सरकार बनले नाही. त्यामुळे महायुतीत मोठी गडबड आहे. हे दिसून आले आहे. हे सर्वजण स्वार्थासाठी एकत्र आले आहे.
संजय राऊत यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, अजित पवार यांचं राजकारण हे वेगळं आहे. त्यांनी दिल्लीसोबत व्यवस्थित जुळून घेतलं असून त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्लीने टाकल्या आहेत. सलग ६ वेळा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. उपमुख्यमंत्री पद हे आरक्षित असल्याचं दिसत आहे. त्यासाठी अनेकांचं योगदान आहे. उत्तम सहकारी म्हणून अजित पवार यांनी काम केलं. उद्धव ठाकरे देखील अजित पवार यांचं नेहमी कौतुक करतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक देखील केलं आहे.