Sharad Pawar will walk in Ashadhi wari : आषाढी वारी सोहळा जवळ येऊन ठेपला आहे. या वर्षी देहू आणि आळंदी येथून २९ जून रोजी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबा महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होणार आहे. दरम्यान, एक दिवस तरी वारी अनुभवावी या उपक्रमा अंतर्गत या वर्षी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार हे देखील या वर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ते ७ जुलै रोजी तुकोबांच्या पालखीत ७ जुलै रोजी बारामती ते सणसर असा प्रवास करणार आहेत, अशी माहिती शाम सुंदर महाराज सोन्नरकर यांनी दिली. पवार यांच्या सोबत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार हे देखील सहभागी होणार आहेत.
या वर्षी पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा २९ जून रोजी निघणार आहे. 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. हा उपक्रम शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली व शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने आयोजित केला जातो.
यावर्षी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा हा ७ जुलै रोजी बारामती ते सणसर दरम्यान जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शरद पवार हे देखील हे या सोहळ्यात सहभागी होऊन पायी चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती पवार यांना देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी (दि. १७ जून) मुंबईतील 'सिव्हर ओक' येथे शरद पवार यांची भेट घेतली. वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' यात सहभागी होणारी मंडळी दिवसभर चालून समजून घेतात.
या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. याची माहिती शरद कदम यांनी पवार यांना दिली. "उपक्रम अत्यंत स्तूत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. या उपक्रमात या वर्षी मी सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पवार यांच्या सोबत, ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव हे देखील सहभागी होणार आहेत.
गेली पाच वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडीचे देखील आयोजन केले जाते. संतांनी आपल्या अभंग, ओव्या, ग्रंथातून समता, बंधूत्व, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य याचा जो विचार मांडला आहे, त्यांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे, हे संविधान कीर्तन-प्रवचनातून लोकांसमोर मांडले जाते. संविधान समता दिंडी ही पुण्यातून पंढरपुरपर्यंत जाते, अशी माहिती संविधान समता दिंडीचे चालक शामसुंदर महराज सोन्नर यांनी शरद पवार यांना दिली आहे.
संबंधित बातम्या