Sharad Pawar on RSS: महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथ अजूनही सुरुच आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेते मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार RSS बाबत गौरवोद्गार काढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वयंसेवकांचं कौतुककेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत शरद पवार गटाची दोन दिवसीय बैठक आहे. या बैठकीत शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) प्रशंसा केली. त्यांनी आपल्या भाषणात संघाच्या कामकाजाचे कौतुक केले.
शरद पवार म्हणाले की, आरएसएसची काम करण्याची पद्धत अनोखी आहे. जर संघ परिवार एखाद्या कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील २० वर्षे घेत असेल तर त्याला वाऱ्यावर सोडत नाही. संघ त्याच्या उर्वरित जीवनासाठी त्याला योग्य स्थानी नियुक्त करतो.
शरद पवारांनी पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणून संबोधलं. या शहरातील प्रत्येक महत्वपूर्ण शैक्षणिक संस्थेत आरएसएसचे लोक काम करत आहेत. फर्गुसन कॉलेज, एस.पी. कॉलेज, मॉडर्न कॉलेज, एमईएस कॉलेज आदिमध्ये आरएसएस कार्यकर्ते काम करतात. जे लोक अनेक वर्षे परदेशात किंवा दुसऱ्या राज्यात संघाचे काम करत असतात व जेव्हा ते परत येतात त्यावेळी अशा लोकांना या संस्थांमध्ये नियुक्त केलं जातं. त्याचबरोबर त्यांना राहण्याची योग्य सोय केली जाते.
शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. शरद पवार म्हणाले, संघाकडे समर्पित स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाहीत. निवडणुकीपूर्वी इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) १७ नवीन महामंडळांची निर्मिती करणं भाजपसाठी महत्वाचं ठरलं आणि त्यांना पाठिंबा मिळविण्यातही मदत झाली.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयाचे श्रेयही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते. निवडणूक विजयात संघाचे काम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचा मोठा वाटा असल्याचं शरद पवार म्हमाले. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची आठवणही करून देत १९६२ व १९७७ मधील विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला.
शरद पवार म्हणाले लोकसभेतील विजयानंतर राष्ट्रवादी पूर्णपणे बेफिकीर झाली,तर सत्ताधारी पक्ष (महायुती) निवडणुका जिंकण्यासाठी सतत काम करत राहिले आणि अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्या. विरोधी पक्षांनी या काळात कठोर निर्णय घेतले आणि निवडणुकीत अथक परिश्रम घेतले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत आरएसएसने खूप सतर्कतेने काम केले आणि भाजपला निवडणूक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित बातम्या