मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपालांवर टीका करताना भास्करराव जाधवांची जीभ घसरली, घरगडी म्हणून उल्लेख

राज्यपालांवर टीका करताना भास्करराव जाधवांची जीभ घसरली, घरगडी म्हणून उल्लेख

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 05, 2022 10:14 PM IST

राज्यपालांवर टीका करताना शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांची जीभ घसरली आहे. भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा घरगडी असा उल्लेख केला आहे.

भास्करराव जाधवांची राज्यपालांवर टीका
भास्करराव जाधवांची राज्यपालांवर टीका

रत्नागिरी –  राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत राहतात. मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नुकतीच त्यांच्यावर महाराष्ट्राची माफी मागण्याची नामुष्की आली होती. त्यातच महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज्यपालांवर विविध विषयांवरून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेल्या जहरी टीकेनंतर शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनीही राज्यपालांवर खालच्या पातळीवरील टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा घरगडी असा उल्लेख केला आहे. 

भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्राच्या विरोधातील वक्तव्याकवरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केल्याचीही टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.  ते चिपळूण येथे बोलत होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. तसेच संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरही टिपण्णी केली. संजय राऊतांचे त्यांनी कौतुक केले. 

देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री राहु द्या -

भास्कर जाधव यांनी राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर खोचक टीका केली. ते म्हणाले की, 'मंत्रिमंडळाचा विस्तार होऊच नये. त्याची गरजच नाही..आता लोकांना लोकशाही काय आहे, ते समजले.  आता बिनखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचेच राबवतायत.  म्हणून मंत्रीमंडळाचा विस्तार न होता भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम राबवला जावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत.' 
 

 लोकसभेच अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना अटक -   

भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी संजय राऊत यांना अटक केली.  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना संजय राऊत यांनी पत्र लिहिलं होतं. पाच ऑगस्टपर्यंत ईडीकडे त्यांनी वेळ मागितला होता. अधिवेशन संपल्यानंतर सात ऑगस्ट रोजी हजर राहतो, असं सांगितलं होतं. पण राऊतांच्या पत्राला कोणतंही उत्तर न देता, लोकसभेच अधिवेशन सुरू असताना संजय राऊत यांना ईडीने अटक केली, असा आरोप भास्कर जाधवांनी केला. 

IPL_Entry_Point