Satyajeet Tambe : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष देण्याची गरज, सत्यजीत तांबेंनी वेधलं सरकारचं लक्ष
Satyajeet tambe on woman passengers : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन महिला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे, असे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत व्यक्त केले.
ट्रेंडिंग न्यूज
महिला प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ते विधानपरिषदेत बोलत होते. गृह विभाग व रेल्वे पोलीस याबाबत योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
सत्यजीत तांबे म्हणाले, मुंबईमधील धावत्या रेल्वेमध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अनेक छोट्या रेल्वे स्थानकांवर लाईटची पुरेशी व्यवस्था नाही, त्या स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा कर्मचारी नाही, त्यामुळे रात्री १० च्या पुढे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या ठिकाणी रेल्वे पोलिसांच्या मदतीने एक कर्मचारी आणि लाईटची व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी चर्चेमध्ये व्यक्त केले.
ट्वीटरवर एका महिला प्रवाशाने केलेल्या याबाबतच्या ट्वीटवर देखील आ. तांबे यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी ट्रेनचा प्रवास करत असताना मी देखील हे अनुभवलं. रेल्वेमध्ये, छोट्या रेल्वे स्थानकांवर पोलीस सुरक्षा रक्षक नसतात, तर काही ठिकाणी लाईट देखील नसते. रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या व नागरिकांच्या दृष्टीने हे नक्कीच धोकादायक आहे. हा मुद्दा मी नुकताच सभागृहात उपस्थित केला होता. यासंदर्भात गृह विभाग आणि रेल्वे पोलीस योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा करूया. छोट्या रेल्वे स्थानकांवर एक पोलीस कर्मचारी तैनात करून लाईटची व्यवस्था करणं गरजेच आहे. असे ट्वीट त्यांनी केले.