Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहे. त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे. आता अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील या प्रकरणी पुढाकार घेत राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जानेवारीरोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असून संतोष देशमुखांना श्रद्धांजली देखील यावेळी वाहण्यात येणार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण देखील करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड यांचे नाव पुढे आले असून विधानसभे देखील यावरून गदारोळ झाला. या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास करण्यात येणार व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध राज्यभर सुरू आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. राज्यात एखाद्या सारपंचाची या पद्धतीने अमानुष हत्या झाली. त्यांच्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरपंच परिषदेने केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरपंच परिषदेतर्फे ९ जानेवारी बंद पुकारण्यात आला आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंच्यायती या बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे राज्य हादरले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सरपंचांना आता त्यांना त्यांच्या जिवाची भीती वाटू लागली आहे. समाजसेवा करणे पाप आहे का असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे. तसेच देशमुख कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील संरपंच परिषदेने केली आहे.
संबंधित बातम्या