Walmik Karad: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आतापर्यंत चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अद्यापही मुख्य आरोपी वाल्मिक कराड फरार असून पोलीस गेल्या २० दिवसांपासून त्याचा शोध घेत आहेत. वाल्मिक कराड लवकरच बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, अशी चर्चा सुरू असताना महत्त्वाची माहिती समोर आली. वाल्मिक कराड शेवटी कुठे होता? त्याचे ठिकाण समजले आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली. तेव्हापासून आरोपी वाल्मिक कराड फरार असून तो शेवटी कुठे होता, याची माहिती मिळाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला, ज्याचे फोटो स्वत: कराडने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर केले होते. महत्त्वाचे म्हणजे, त्यावेळी त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही त्याच्यासोबत होते.त्यानंतर कराडचा मोबाईल बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, वाल्मिक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आले
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडीचे बड्या अधिकाऱ्यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या ९ पथकांमधील १५० पोलीस कर्मचारी काम करत आहेत. वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांची बँक खाती गोठावण्यात आली आहेत.
बीड सरपंच हत्या प्रकरणात अजित पवार गटातील नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची विरोधकांची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी आपण पहिल्या दिवसापासून करत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. मारेकरी माझ्यासह कुणाच्याही जवळचे असले तरी आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असे मी म्हटले आहे. तरीही मला टार्गेट केले जात असेल तर हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे, हे समजू शकते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने बीड जिल्ह्यात पवनचक्की लावणाऱ्या ऊर्जा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती आणि मागण्या मान्य न झाल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.त्यावेळी देशमुख यांनी मध्यस्थी करून खंडणी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे कारमधून अपहरण करून हत्या करण्यात आली.
संबंधित बातम्या