RajyaSabha: ‘हा तर रडीचा डाव’, मतमोजणी थांबवल्यामुळे संजय राऊतांचा संताप
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कुणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला आहे, असा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान पार पडले. मात्र ४ वाजता मतदान संपल्यानंतर अद्याप अद्याप मतमोजणीला सुरूवात झालेली नाही. भाजपने महाविकास आघाडीतील दोन मतदार, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला बाल कल्याण मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांच्या मताबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवून त्यांचे मत बाद करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अहवाल मागितला असल्याने राज्यसभेची मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. मात्र मतमोजणीची प्रक्रियाच थांबल्यामुळे शिवसेना नेते आणि राज्यसभा निवडणुकीतील एक उमेदवार संजय राऊत चांगलेच भडकले आहे.
या ताज्या घडामोडींवर राऊत यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे’, असा थेट सवाल राऊत यांनी केला आहे. 'ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला आहे', असा थेट आरोप करत राऊत यांनी निशाणा साधला आहे. ‘आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र’ लिहून राऊत यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मतमोजणी का थांबली
आज सकाळी राज्यसभेच्या मतदानाला सुरूवात झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका दुसऱ्यांच्या हातात देऊन निवडणूक नियमांचा भंग केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. या दोघांचंही मत बाद करावं, अशी मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडं केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनंही भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका आशिष शेलार यांच्याकडं दिली, असा आक्षेप काँग्रेसचे आमदार अमर राजुरकर यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवला आहे. या आक्षेपावर विचार करून केंद्रीय निवडणूक आयोग पुढील निर्णय घेणार आहे.
संबंधित बातम्या