बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढली; राऊत म्हणाले, तुम्ही…
महाराष्ट्र सरकारने बंडखोरी केलेल्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ३७ आमदारांच्या सहीचं एक पत्र ट्विट केलं आहे.
शिवसनेत बंडखोरी केल्यानंतर सध्या गुवाहाटीत आमदारांसह असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या ट्विटरवर आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने बंडखोरी केलेल्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेतली आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ३७ आमदारांच्या सहीचं एक पत्र ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं की, आमदारांना महाराष्ट्रात सुरक्षा दिली जाते. राज्याच्या बाहेर असल्यास त्यांना सुरक्षा दिली जात नाही. तसंच सरकार फक्त आमदारांना सुरक्षा देते, त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी राज्य सरकारची नाही अशीही प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
संजय राऊत म्हणाले की, घरच्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आमदार महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. ते पळून गेले आहेत. त्यांना पुरवण्यात येणारी सुरक्षा ही आमदार म्हणून असते. त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा नसते असंही राऊतांनी स्पष्ट केलं. राऊत पुढे म्हणाले की, "तुम्ही महाराष्ट्रात या. आपल्या राज्यात या असं भिकाऱ्यासारखं का वणवण भटकताय. असं करू नका. स्वत:ला वाघ मानताय तर बकरीसारखं बें बें करू नका. हे सोडून द्या अजुनही संधी गेलेली नाही."
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर म्हटलं की, "राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांच संरक्षण काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाने हे संरक्षण काढले आहे. आमदारांची आणि कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या अडीच वर्षात अशाच पद्धतीने घटक पक्षांकडून शिवसेनेचं खच्चीकरण केलं जात असल्याचं एकनाथ शिंदेनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या आमच्या मागे महाशक्ती असल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "हजारो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. वर्तमान आणि भविष्याबाबत अनेक निर्णय घेतले जातील. पैसै आहेत म्हणून महाशक्ती कुणाच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीने हायजॅक करता येणार नाही. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे."
संबंधित बातम्या
विभाग