खासदार संजय राऊत यांची अटक टळली! हायकोर्टाकडून जामीन मंजूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खासदार संजय राऊत यांची अटक टळली! हायकोर्टाकडून जामीन मंजूर

खासदार संजय राऊत यांची अटक टळली! हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Published Sep 26, 2024 04:05 PM IST

Sanjay Raut : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देतानाच उच्च न्यायालयानं संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.

संजय राऊत यांची अटक टळली! हायकोर्टाकडून जामीन मंजूर
संजय राऊत यांची अटक टळली! हायकोर्टाकडून जामीन मंजूर (PTI)

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांना मुंबईतील न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) आरती कुलकर्णी यांनी संजय राऊत यांना १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. न्यायालयानं राऊत यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अन्वये दोषी ठरवलं. तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. राऊत यांच्या वकिलांनी तातडीनं शिक्षेला स्थगिती आणि जामीन या दोन्हीसाठी अर्ज दाखल केले होते. ते कोर्टानं मंजूर केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेंतर्गत सार्वजनिक शौचालयांचं बांधकाम आणि देखभालीशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा संबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्या विरोधात मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर निकाल देताना माझगाव कोर्टानं राऊत यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. 'मी जे काही बोललो ते लोकांच्या हिताचं बोललो. एक खासदार म्हणून, एका पक्षाचा नेते म्हणून व पत्रकार म्हणून मला भ्रष्टाचाराची काही माहिती मिळाली तर बोलणं माझं काम आहे. भाजपवाल्यांप्रमाणे मीही ती माहिती दडपली तर भ्रष्टाचार मोकाट सुटेल, असं ते म्हणाले.

पोपटलालसारखे धंदे आम्ही करत नाही!

‘याचिकाकर्त्यांच्या मनाला वेदना झाल्या अशी टिप्पणी न्यायालयानं सुनावणीच्या वेळी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं. 'वेदना कशा होऊ शकतात? त्यांचे (मेधा सोमय्या) पती जेव्हा खोटे आणि भंपक आरोप करतात, तेव्हा इतरांना वेदना होत नाहीत का? आमच्याही मनाला वेदना होतात. ज्यांच्यावर यांनी आरोप केले, त्यांचे कागद दाखवले, त्यांना अटक करण्यासाठी आंदोलनं केली ते सर्व ह्यांच्या पक्षामध्ये बसलेले आहेत. ते पाहून आमच्या मनाला किती वेदना होत असतील?, असा प्रश्न राऊत यांनी केला. उटसुट कुणावरही घाणेरडे आणि खोटे आरोप करायचे. मग त्याच भ्रष्टाचाऱ्यांना परत सरकारमध्ये घेऊन बसायचं हे नागड्या पोपटलालसारखे आमचे धंदे नाहीत, असंही राऊत यांनी सुनावलं.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर