मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Mass Suicide : म्हैसाळमधील ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड !

Sangli Mass Suicide : म्हैसाळमधील ‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड !

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 27, 2022 09:27 PM IST

म्हैसाळ गावातील अंबिकानगर येथे एकाच कुटुंबातील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

म्हैसाळमधील‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड
म्हैसाळमधील‘त्या’ ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड

सांगली - मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावातील अंबिकानगर येथे एकाच कुटुंबातील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या खासगी सावकाराच्या छळामुळे झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून त्या ९ जणांची आत्महत्या नसून हत्याकांड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांनी या लोकांच्या जेवणात विष घालून त्यांना मारल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय ४८ रा. सर्वदेनगर सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवसे (वय ३९ रा. वसंतविहार ध्यानेश्वरी प्लॉट सोलापूर) यांना अटक केली आहे.मृत डॉ. माणिक बल्लापा व्हनमोरे व पोपट यलाप्पा व्हनमोरे यांची गुप्त धनाबाबत एका अनोळखीसोबत भेटी होत होत्या. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी समोरच्या व्यक्तीस पैसे दिले होते. तसेच ती व्यक्ती वरचेवर रात्रीच्या वेळी म्हैसाळ येथील व्हनमोरे यांचे घरी येत होती अशी खबर मिळाली होती.

त्यानुसार सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे डॉ. व्हनमोरे यांचे घरी येणाऱ्या व्यक्तीबाबत सखोल तपास केल्यानंतर सदर व्यक्ती ही सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अब्बास आणि धीरजला सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले. १९ जून रोजी दोघे संशयित म्हैसाळमधून येवून गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सदर व्यक्तींचा गुन्ह्यातील सहभागाबाबत सखोल चौकशी करुन पुढील कारवाई करणेत येत आहे. ही हत्या गुप्तधनातून व झाल्याचे स्पष्ट होत आहे.

काय आहे प्रकरण?

शिक्षक पोपट आणि डॉ. माणिक वनमोरे यांच्यासह नऊ जणांच्या आत्महत्येला बुवाबाजी आणि तंत्रमंत्र जबाबदार असल्याची चर्चासुरू होती.सुरुवातीला लाख-दोन लाख रुपये गुंतविल्यानंतर पैशांचा हव्यास वाढत गेला आणि वनमोरे बंधू जाळ्यात अडकत गेले. गुप्तधन किंवा तंत्र-मंत्राच्या पैशांचा विषय असल्याने त्यांनी गावात कोणाकडेही वाच्यता केली नाही. त्यामुळे हे विषय त्यांच्या मृत्यूसोबतच अज्ञात राहिले. वनमोरे बंधूंनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्येही याचा उल्लेख नव्हता.

डॉ. माणिक वनमोरे यांचा करमाळा (जि. सोलापूर) येथील काका नामक एका मांत्रिकाशी संपर्क आल्याचे बोलले जाते. कालांतराने तासगावमधील एका बुवाच्याही संपर्कात होते. म्हैसाळमधील जुन्या घरातील स्वयंपाकघरात गुप्तधन असून ते काढायचे असेल, तर मोठा विधी करायला लागेल, त्यासाठी मोठा खर्च केला पाहिजे, असे त्याने सांगितले होते. महिन्याला दीड-दोन लाखांची मिळकत असलेले वनमोरे बंधू गुप्तधनाच्या हव्यासाला भुलले आणि मांत्रिकाच्या खिशात पैसे ओतत गेले. घरातले पैसे संपले, महिलांच्या अंगावरील दागिनेही विकले, तरीही मांत्रिकाचा हव्यास संपला नाही आणि वनमोरेंची गुप्तधनाची लालसाही! इतकेच नव्हे, तर पैशांसाठी त्यांनी गावातील पतसंस्था आणि खासगी सावकारांचे उंबरठेही झिजविले. यातूनच लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाला.

IPL_Entry_Point

विभाग