Maharashtra Road Accident: सांगलीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परत येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सांगलीच्या तासगाव - मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील ६ जण ठार झाले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.
राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०), सुजाता राजेंद्र पाटील (वय ५५), प्रियांका अवधूत खराडे (वय ३०), ध्रुवा (वय ३), कार्तिकी (वय १), राजवी (वय २) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले (वय ३०) या जखमी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे एकाच कुटुंबातील होते. हे तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परत येत असतांना हा अपघात झाला.
चिंचणी तासगाव - मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्र असल्याने तसेच हा परिसर निर्मनुष्य असल्याने अपघात झाल्यावर तातडीची मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला कालव्यात पडलेली गाडी दिसल्यावर हा अपघात झाल्याचे कळले. यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी महिलेला दवाखान्यात भरती केले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
सर्व जण घरी येत असतांना रात्र झाली होती. दरम्यान, कार चालवत असतांना चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागल्याने त्यांची कार ही थेट कालव्यात कोसळली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या