Sangli Road Accident : सांगली जिल्ह्यातील जतजवळ क्रुझर (cruiser jeep) आणि लक्झरी बसचा (luxury bus) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून १० ते १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर -गुहागर महामार्गावर (vijaypur guhagar highway) सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाले तर २ जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला.
क्रुझर जीपमधून लग्नाचे वऱ्हाड होते. या जीपमधून लोक खच्चून भरली होती. यामधून १८ ते २० जण प्रवास करत होते. विजयपूर-गुहागर महामार्गावर आल्यानंतर जीपने सांगली जिल्ह्यातील जतकडून मुंबईकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप लक्झरी बसवर जाऊन आदळली.
अपघातस्थळाचा दृष्य खुपच भीषण होते. क्रुझरने बसला दिलेली धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात चालकासह पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
जीपमध्ये मागच्या सीटवर बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नकार्यासाठी जात होते. मात्र, लग्ना समारंभात पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना मार्गावर स्कॉर्पिओ गाडी पलटल्याने झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले आहेत. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. हळदी समारंभासाठी जाणाऱ्या कुटूंबीयांवर काळाने घाला घातला. खामगाव जालना महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओ पलटल्याने ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी गाडी पलटल्याने हा अपघात झाला.
संबंधित बातम्या