मुंबई : आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची खंडणी केल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबी अधिकारी (NCB) आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची शनिवारी तब्बल पाच तास चौकशी केली. दरम्यान, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. या बाबटचा निर्णय आज मुंबई कोर्टात होणार होता. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने समीर वानखडे यांना दिलासा देत ८ जून पर्यंत त्यांना अटके पासून संरक्षण दिले आहे. या सोबतच सीबीआयला त्यांचा अहवाल ३ जून पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयामुळे समीर वानखडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सीबीआयने वानखेडे यांचे निवासस्थान आणि इतर संबंधित ठिकाणांवर छापेमारी करत चौकशी सुरू केली होती. या कारवाई विरोधात वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार १९ मे रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने वानखेडेंना २२ मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शनिवार-रविवारी वानखेडे यांची सलग दोन दिवस पाच तास चौकशी करण्यात आली होती.
आर्यन खान प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता यासंबंधी त्यांची चौकशी करण्यात आली होती. वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सीबीआय सोमवारी आपले म्हणणे सादर करणार होते. त्यानुसार आज मुंबई हायकोर्टात समीर वानखडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना ८ जून पर्यंत अटक करण्यात येऊ नसे असे आदेश कोर्टाने दिले आहे. तसेच सीबीआयने त्यांची बाजू ही येत्या ३ जून पर्यंत कोर्टापुढे मांडण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
समीर वानखडे यांना सोशल मिडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत वानखडे यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोर्टातून थेट वानखडे यांनी पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात गेले आहे. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे.
संबंधित बातम्या