Shiv Sena UBT On Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. मात्र, यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारवर तोफ डागली. ठाकरे गटाने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून स्टायपेंडची भीक नको, तर हक्काच्या नोकऱ्या द्या, अशी मागणी करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात बेरोजगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे, यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन आत्महत्या होत आहेत. नुकताच कर्नाटक सरकारने स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने सर्व खाजगी उद्योगांमध्ये ५० ते ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे विधेयक मंजूर केले. कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले गेले.
बाळासाहेबांनी ५० वर्षांपूर्वी रुजलेला विचार बाजुच्या कर्नाटकात बहरला. कर्नाटक सरकारने स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत घेतलेला निर्णयाची महाराष्ट्रामध्ये पुनावृत्ती होईल का? नोकऱ्यांसाठी महाराष्ट्र पेटून उठेल, असे वातावरण झाले. सध्या महाराष्ट्राची लुटमार सुरू आहे. राज्यातील सर्व मोठे उद्योग आणि नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, असाही आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला.
सरकार बारावी उतीर्ण आणि पदवीधरांना पाच- दहा हजारांचा मासिक भत्ता देऊन त्यांचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार उघडपणे महाराष्ट्रातील रोजगार पळवत आहे. मुंबईचे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून पडले.यामुळे राज्यातील बेरोजगारांना रोजगार कसा मिळणार? असाही सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीही सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे.
- किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदवीका, पदवी, पदव्युत्तर असावी.
- उमेदवाराचे आधार नोंदणी असा
- बँक खाते आधारशी लिंक असावे.
- कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
-१२ वी पास: ६ हजार रुपये (दरमहा)
- आय.टी.आय/ पदविका: ८ हजार रुपये (दरमहा)
- पदवीधर/पदव्युत्तर: १० हजार रुपये (दरमहा)
संबंधित बातम्या