Pradeep Kurulkar : कुरुलकरांच्या जागी अब्दुल, हुसेन किंवा शेख हे शास्त्रज्ञ असते तर…; शिवसेनेचा भाजप-संघावर हल्लाबोल
Uddhav Thakceray - Narendra Modi
Saamana Editorial on Pradeep Kurulkar : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रदीप कुरुलकर यांच्या निमित्तानं शिवसेनेनं संघ व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Saamana Editorial on Pradeep Kurulkar : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील (डीआरडीओ) एक शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कुरुलकर हा संघ परिवाराशी संबंधित असल्याचं समोर आल्यामुळं सत्ताधारी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरोधकांच्या निशाण्यावर आहे. शिवसेनेचं (ठाकरे गट) मुखपत्र दैनिक 'सामना'नं याच मुद्द्यावरून संघ व भाजपवर जळजळीत टीका केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
'दे. भ. डॉ. कुरुलकर' या शीर्षकाखाली 'सामना'नं आज अग्रलेख लिहिला आहे. त्यात कुरुलकर यांच्या कारनाम्यावर प्रकाशझोत टाकत संघ व भाजपवर आसूड ओढण्यात आले आहेत.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
- 'डॉ. कुरुलकर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, कारण या माणसावर संघ विचाराचे (म्हणजेच देशभक्तीचे) पुरेपूर संस्कार झाले आहेत. संरक्षणविषयक धोरणे ठरवणाऱ्या १० शास्त्रज्ञांची जी समिती राष्ट्रीय पातळीवर नेमण्यात आली त्यात डॉ. कुरुलकरांचा समावेश आहे.
- मोदींचं सरकार आल्यापासून देशातील अत्यंत संवेदनशील जागेवर संघ परिवारानं स्वतःची माणसं हट्टानं बसवली आहेत. त्यांना देशाचा नकाशा बदलता आला नाही. त्यामुळं ते संस्कृती बदलू पाहत आहेत व त्यासाठी मोक्याच्या जागी माणसं चिकटवली जात आहेत.
- कुरुलकर यांना संघाची, पर्यायानं भाजपची कवचकुंडलं होती. संघ विचारांचा इतका मोठा शास्त्रज्ञ फितूर झाला तरीही ना पंतप्रधान बोलत आहेत, ना संरक्षणमंत्री बोलायला तयार आहेत. निदान नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याची थुंकी उडवून आरोपबाजी करणाऱ्यांनी तरी कुरुलकरांच्या कारनाम्यांवर बोलायला नको काय?
Eknath Shinde : निकालावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांनी हात जोडले, एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा नेमक्या कुणाला?
- 'संघ परिवारानं गेल्या सात-आठ वर्षांत संरक्षण, विज्ञान, कला, संस्कृती, कायदा, न्याय आणि प्रशासनात त्यांची माणसे बसवली. केंद्रीय तपास यंत्रणांचेही तेच हाल आहेत. त्यामुळं असे प्रखर राष्ट्रवादी, देशभक्त डॉ. कुरुलकर कोणते मुखवटे लावून कोठे वावरत आहेत, ते सांगता येणार नाही. देशाच्या न्यायव्यवस्थेचा खेळखंडोबा याचमुळं झाला.
- देशाची धोरणं ठरवणं हे आता रा. स्व. संघाच्या हातात आहे. राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीनं सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसं चिकटवणं हे एकंदरीत धोरण आहे.
- डॉ. कुरुलकर हे शेख, हुसेन, इब्राहिम असते तर थेट दाऊदशी संबंध जोडून विरोधी पक्षालाच जाब विचारणारे आंदोलन सुरू झाले असते, पण ‘दे. भ.’ डॉ. कुरुलकरांच्या बाबतीत भाजप व संघ ‘मौना’त गेले. यालाच ढोंग म्हणतात, असा घणाघात अग्रलेखातून करण्यात आला आहे.
- नवाब मलिक यांनी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. इकडे भाजपच्या देशभक्तांनी देश विकला! फरक कळतोय का? निदान महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनी तरी यावर प्रश्न विचारायला हवेत!
- ‘डीआरडीओ’सारख्या संवेदनशील संस्थेतला राष्ट्रद्रोह भाजप पचवू पाहत आहे. कारण अटक झालेल्या शास्त्रज्ञाचं नाव अब्दुल, हुसेन, सर्फराज, शेख असं नाही. ते तसं असतं तर ‘डीआरडीओ’मध्ये पाकडे घुसवून देशाला धोका निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष कसा करीत आहे यावर चर्चासत्रं झडली असती. भाजपचे पुढारी रस्त्यावरही उतरले असते. देश पाकड्यांच्या हाती विकला असं त्यांनी जाहीर केले असते, पण कुरुलकरांच्या बाबतीत मामला ‘थंडा’ पडला आहे. एकदम थंडा कोकाकोला!