मशिदींवरील भोंग्यावरून (Loudspeaker Row) सध्या महाराष्ट्रासह देशातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेशात (UP) योगी सरकारनं भोंग्यांविरोधात मोहीम उघडली असून महाराष्ट्रात मनसेनं भोंग्यांना भोंग्यांनी उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athawale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आठवले यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास विरोध केला आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. 'मशिदींवरील भोंगे काढण्यास आरपीआयचा विरोध आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कुणी गेल्यास त्यांना आरपीआयचे कार्यकर्ते विरोध करतील आणि मशिदींचं संरक्षण करतील, असं आठवले यांनी म्हटलं आहे. मुस्लिम समाजातील नेत्यांनाही आठवले यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. 'मुस्लिम समाजातील मुल्ला मौलवींनी कुठलीही चिथावणीखोर वक्तव्य करू नये. शांतता कायम राहील याची काळजी घ्यावी. उलटसुलट वक्तव्य करून आपल्या समाजाला संकटात टाकू नये, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला होता. येत्या ३ मे नंतर भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यावरून वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबाद इथं जाहीर सभा घेऊन अधिक आक्रमक भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या रामदास आठवले यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
संबंधित बातम्या